खासगी मुंबई-अहमबाद तेजस एक्सप्रेस पुढच्या महिन्यापासून बोरिवली आणि इतर तीन स्थानकांवर थांबवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. सुरुवातीला ही गाडी सुरत आणि वडोदरा या दोन स्थानकांवर थांबवण्यात येणार होती. परंतु सुरत आणि वडोदरा या दोन स्थानकांव्यतिरिक्त तेजस एक्स्प्रेस बोरीवली, वापी, भरुच आणि नाडियाद येथेही थांबेल असे रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.आयआरसीटीसीकडून भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आलेली ही गाडी १७ जानेवारी रोजी आपला पहिला प्रवास सुरू करेल. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटून ती बोरीवली स्थानकात दुपारी ४.१४ वाजता पोहोचेल. बोरीवली स्थानकात ही गाडी २ मिनिटे थांबेल. त्यानंतर या गाडीचा पुढील थांबा असेल वापी. वापीला गाडी ५.३७ वाजता पोहोचेल. तर, गाडीचा तिसरा थांबा सुरतला देण्यात आला आहे. तेजस सुरतला संध्याकाळी ६.४७ वाजता पोहोचेल. गाडीचा चौथा थांबा भरूच हा देण्यात आला आहे. भरूचला गाडी ७.२९ वाजता पोहोचेल. तर वडोदऱ्याला गाडी रात्री ८.१८ वाजता पोहोचेल. अहमदाबादला पोहोचण्यापूर्वी तेजस नाडियाद स्थानकात ९.०३ वाजता पोहोचेल. अहमदाबादला पोहोचण्याची गाडीची वेळ आहे रात्री ९.५५ वाजता. गाडीचा अहमदाबादवरून परतीचा प्रवास सुरू होईल पहाटे ६.४० वाजता. तेजसची मुंबईत पोहोचण्याची वेळ आहे दुपारी १.१० वाजताची.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस एक्स्प्रेससाठी बोर्ड प्रवासी परताव्याच्या योजनेचा विचार करीत आहे. या योजनेनुसार तेजसला उशीर झाल्यास भाड्याचा काही भाग प्रवाशांना परत केला जाईल. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान पहिल्या खासगी तेजस ट्रेनसाठी आयआरसीटीसीने एक तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास १०० रुपये आणि दोन तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास २५० रुपये परत करण्याचे धोरण तयार केले होते. मुंबई-अहमदाबाद तेजससाठीही अशीच योजना आखली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
