अण्णांबद्दलच्या अफवांमुळे संताप

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनास पाठिंब्यासाठी राळेगणसिद्धी गावात गर्दी वाढत आहे. तर दुसरीकडे अण्णांच्या आंदोलनाविषयी आणि वैयक्तिक स्वरूपातही सोशल मीडियातून अफवा परसविण्यात येत असल्याने समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. अण्णांची प्रकृती उत्तम असून यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठीती यंत्रणा सक्षम करावी आणि अत्याचाराच्या प्रकरणातील रखडलेल्या फाशीच्या शिक्षेची त्वरित अमंलबजावणी व्हावी, या मागणीसाठी हजारे यांनी २० डिसेंबरपासून मौनव्रत सुरू केले आहे. यासंबंधी त्यांच्याशी सरकारकडून अद्याप कोणताही संपर्क केलेला नाही. एकीकडे हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणाहून कार्यकर्ते येत आहेत. विद्यार्थीही मोठ्या संख्येने येत आहेत. तर दुसरीकडे हजारे यांच्या आंदोलनाबद्दल सोशल मीडियातून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रकृतीविषयी अफवाही पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे यासंबंधी चौकशी करण्यासाठी राळेगणसिद्धी येथील कार्यालयात हितचिंतकांचे दूरध्वनी येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारे यांचे हे मौन आंदोलन आहे. त्यांनी उपोषण केलेले नाही. तसेच त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे राळेगणसिद्धी येथील कार्ययालयातून सांगण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी पारनेर येथील किसान इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धीत विद्यार्थ्यांनींनी फेरी काढली. यानंतर स्वाती चेडे, सोनिया गुंजाळ, पुष्पा ठुबे, संदीप ठुबे, विश्वनाथ उमाप, आशालता नायडू यांनी मनोगत व्यक्त केले. याचवेळी तृप्ती चेडे, प्रबोध गजरे, ओकार शिंदे, प्रियल साठे, ओशियन पठारे, सौरभ औटी या व संगमनेर, बोटा येथील विद्यार्थ्यांनी महिला व युवतींच्या व्यथा सडेतोडपणे मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *