इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP)एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात पाच जवान ठार झाले, तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. या घटनेत एकूण सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचं समजतं.
नारायणपूर येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील जवानांमध्ये आज सकाळी जोरदार वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. यात आणखी तीन जवान जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहमान खान या कॉन्स्टेबलनं आपल्या पाच सहकारी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.
