जैन समाज धार्मिक सिद्धांतावरच चालणार; कोर्टाच्या निर्णयावर नाही

जैन समाजाच्या प्रथा-परंपरांमध्ये ढवळाढवळ करणारा न्यायालयाचा कोणताही निर्णय आम्ही मानत नाही. जैन समाज धर्मानं घालून दिलेल्या तत्वांवरच चालणार, कोर्टाच्या निर्णयावर नाही,’ असं जैन धर्मगुरू सुपर्श्र्व सागर यांनी म्हटलं आहे.

दिगंबर जैन समाजात संथारा प्रथा पूर्वापार चालत आली आहे. या प्रथेनुसार, गुरू आज्ञेनंतर जैन धर्मातील एखादी व्यक्ती स्वेच्छेनं अन्नत्याग करून मृत्यूला जवळ करते. अशा पद्धतीनं देहत्याग केल्यामुळं आत्मा व परमात्म्याचं मीलन होतं, अशी श्रद्धा आहे. राजस्थान उच्च न्यायालयानं जैनांच्या या संथारा प्रथेला आक्षेप घेतला होता. ‘ही प्रथा सती प्रथेसारखी असून अशा पद्धतीनं कोणालाही आत्महत्या करण्याची परवानगी देता येणार नाही,’ असं सांगत न्यायालयानं या प्रथेवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

न्यायालयाच्या या निर्णयावर जैन धर्मगुरूंनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. ‘न्यायालयाचा हा निर्णय अनावश्यक आहे. आम्ही हा आदेश मानणार नाही. आम्ही फक्त जैन धर्माच्या सिद्धांतावरच चालतो. जैन समाजातील एखाद्या व्यक्तीनं देहत्याग करण्याचा (संथारा) निर्णय घेतल्यास त्याला कोणीही थांबवू शकत नाही,’ असं सुपर्श्र्व सागर म्हणाले.

पार्श्वनाथ मंदिराचे सचिव सुधीर जैन यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. ‘अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या धार्मिक प्रथा-परंपरांमध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. संथारा प्रथेची आत्महत्येशी तुलना करणंच गैरलागू आहे. संथारा ही पूर्णपणे धार्मिक बाब आहे. त्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही,’ असं जैन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *