मरोळस्थित एका कॉल सेंटरमधून अमेरिकेतील चार हजार ग्राहकांना १० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मरोळमधील मांगल्य साफल्य इमारतीतील या कॉल सेंटरवर छापा घालून एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री १९ जणांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार आरिष लोखंडवाला, मुनाफ शेख, झाकिर रेहमान यांचा पोलीस शोध घेत आहेत.
‘क्रेडीट स्कोअर’ कमी असल्यास कर्ज मिळण्यात अडचणी येतात. अशा ग्राहकांना शोधून त्यांना वित्त संस्थांकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. यासाठी आरोपी अलरिफ ट्रेडिंग प्रा. लिमिटेड या कंपनीचे नाव सांगून ग्राहकांना ‘कॅश मी ऑन’ या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगितले जात असे. त्यामुळे या ग्राहकांची सर्व माहिती या कॉल सेंटरकडे जमा होत असे. कर्ज मंजुरीसाठी या ग्राहकांकडून रद्द धनादेश घेतले जात. हे धनादेश सॉफ्टवेअरचा मदतीने बदलून घेतले जात असत. बदलेल्या धनादेशाचा आधार घेत ही टोळी त्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढून ते दुसऱ्या व्यक्तींच्या खात्यावर वळते करत होती. तसेच ज्या ग्राहकाच्या खात्यावर पैसे पाठविले आहेत, त्याला हे पैसे तुमचे कर्ज खाते सुरू करण्यासाठीची प्रोसेसिंग फी म्हणून पाठविण्यात आल्याची बतावणी करीत. तसेच त्याला वॉलमार्ट कार्ड, ई बे कार्ड, गेम्स टॉप्स, सिफोरा, टार्गेट आदी कंपन्याचे गिफ्ट कार्ड खरेदी करून रक्कम वळती करण्यास सांगण्यात येत होते. हे पैसे या ग्राहकांचे नसल्याने ते लागलीच कॉल सेंटरमधील आरोपीने सांगितल्याप्रमाने गिफ्ट कार्ड खरेदी करून ते आरोपींना पाठवत. त्या गिफ्ट कार्डचा वापर करून आरोपी दुसऱ्या देशात पैसे पाठवून ते काढून घेत असत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली.
अशा पद्धतीने दर महिन्याला ५०० नागरिकांना एक कोटी रुपयांना लुटले जात होते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या कॉल सेंटरमधून दररोज १६०० कॉल केले जात. मरोळमध्ये अशा पद्धतीचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक देवा मुपडे यांना खाबऱ्याकडून मिळाली. त्याची खातरजमा करून पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाने छापा घातला.
आंतराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय
कारवाईत पोलिसांनी २० लॅपटॉप, ३२ मोबाइल, विपीन सिस्टम, दोन मोडेम, एक टी पी लिंक राउटर, ९० फोन जॅक जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये अशा पद्धतीचे कॉल सेंटर सुरू असावेत. तसेच यामागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे
