1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांचा पहिला दोषी याकूब मेमनला फाशी झाल्यानंतरही हे प्रकरण काही केल्या शांत होण्याचं नाव घेत नाही. याकूब मेमनच्या अंत्यदर्शनाला एका गँगस्टरच्या आदेशाने गर्दी जमवण्यात आल्याचा गौप्यस्फोट खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
जेव्हा याकूबचा मृतदेह मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा जास्त गर्दी नव्हती, मात्र नंतर एखाद्या गँगस्टरने धमकावून ही गर्दी जमवली असावी, असा अंदाज असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
याकूबच्या अंत्ययात्रेच्या वेळी मुंबई पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन दक्षिण मुंबईत सुरक्षा पुरवली होती. दुसरीकडे टायगर मेमनने त्याची आई हाफिनाला मुंबईत फोन केल्याचं वृत्त मात्र मुख्यमंत्र्यांनी फेटाळलं आहे.
आगामी सण-उत्सवांच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी भाजप सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

