देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू करून देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे इलेक्नश किंग, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने चेन्नईत निधन झालं. ते ८५ वर्षाचे होते.
टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले. मात्र घरात करमत नसल्याने ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शेषन यांनी राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवडणूक प्रणालीत पारदर्शकता आणण्याचं आणि निवडणूक प्रक्रिया बदलण्याचं सर्व श्रेय शेषन यांनाच जातं. तीन-चार टप्प्यात मतदान घेण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. मतदारांसाठी ओळखपत्र तयार करण्याची कल्पनाही त्यांनीच मांडली होती. शेषन हे १९९० मध्ये निवडणूक आयुक्त बनले होते. १९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार सांभाळला होता.
शेषन यांचं पूर्ण नाव तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन हे होतं
>> त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९३२ रोजी केरळच्या पल्लकड जिल्ह्यात झाला
>> चेन्नईत त्यांचं पदवीपर्यंतच शिक्षण झालं, काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरीही केली
>> १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ पर्यंत त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले
>> मतदान ओळखपत्राची सुरुवात त्यांनीच केली
>> निवृत्त झाल्यावर त्यांनी देशभक्त ट्रस्टची स्थापना केली
>> १९९७मध्ये त्यांनी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही
>> त्यानंतर दोन वर्षाने त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यातही त्यांना यश मिळालं नव्हतं
