११ वर्षात विहिरीतून ७३ कोटीच्या पाण्याची चोरी

वीज चोरीसोबत पाणी चोरीदेखील होत असते. पाणी चोरण्यासाठी एखादी पाइपलाइन फोडून पाणी चोरले जाते. मात्र, पोलिसांनी विहिरीतून पाणी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काळबादेवीतील पांड्या मेन्शनच्या मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील ११ वर्षांपासून टँकरवाल्यांच्या मदतीने ७३ कोटींचे पाणी चोरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 माहिती अधिकार कायद्यातून ही चोरी समोर आली. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेशकुमार यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पांड्या मेन्शनचे मालक त्रिपुरादास नानताल पांड्या आणि त्यांचे सहकारी प्रकाश पांड्या आणि मनोज पांड्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी बेकायदेशीरपणे विहीर खणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे विहीर खणून त्याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला असल्याचाही ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्या यांनी दोन पंप लावून अवैध वीज जोडणीच्या मदतीने पाणी विहिरीतून काढले. टँकर मालक व ऑपरेटर अरुण मिश्रा, श्रवण मिश्रा आणि धीरज मिश्रा यांच्या मदतीने पाण्याची विक्री केली. वर्ष २००६ ते २०१७ दरम्यान ७३.१९ कोटी रुपयांचे पाणी विकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एफआयआरनुसार, आरोपींनी आतापर्यंत ६.१० लाख टँकर पाण्याची विक्री केली आहे. यातील प्रत्येक टँकरची क्षमता १० हजार लिटरची असते. एका टँकरची किंमत १२०० रुपये आहे. मद्रास हायकोर्टाने ऑक्टोबर २०१८मध्ये अवैधरीत्या भूजल साठा वापरणे हा गुन्हा ठरवला होता. या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *