पोलिस ठाण्यात पेटवून घेतले

पोलिस तक्रार घेत नाहीत म्हणून कंटाळलेल्या व्यक्तीने पोलिस ठाण्यातच स्वतःला पेटवून घेतल्याची घटना मंगळवारी गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घडली. रिझवान हमीद जमादार (४५) असे या व्यक्तीचे नाव असून या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात राहणाऱ्या रिझवान जमादार यांचे दोन दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत भांडण झाले. गाडी पार्किंगवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर संबंधित व्यक्ती धमकावत असल्याने रिझवान सोमवारी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी चार ते पाच तास रिझवानला पोलिस ठाण्यातच बसवून ठेवले आणि तक्रार न घेताच घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी रिझवान पुन्हा पोलिस ठाण्यात गेला. मात्र यावेळीही पोलिसांनी तेच केले. पुन्हा चार ते पाच तास बसवून ठेवल्यामुळे रिझवान संतापला. पोलिस आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून तो पोलिस ठाण्याबाहेर गेला. पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन त्याने रॉकेल घेतले. आवाराबाहेरच अंगावर रॉकेल ओतून तो पोलिस ठाण्यात आला आणि स्वतःला पेटवून घेतले. रिझवानला पेटताना पाहून पोलिसांची एकच पळापळ झाली. पोलिस ठाण्यात जे काही मिळेल त्या आधारे पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर रिझवानला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *