काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे वृद्धापकाळाने सोमवारी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता प्रवरा नदीतिरावरील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संगमनेरचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग होता. १९६२ ते ८० अशा चार विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या. २० वर्षे ते आमदार होते. या काळात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण व बॅरिस्टर ए. आर. अंतुले या पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. वयाच्या ६१व्या वर्षी १९८०मध्ये त्यांनी शेवटची निवडणूक लढवून ती जिंकली व १९८५पासून राजकारणातून निवृत्ती घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावरील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या बी. जे. खताळ पाटील यांनी ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘अंतरीचे धावे’ व ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ अशी पाच पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘माझे शिक्षक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही अलीकडेच पार पडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *