मुंबई पोलीस आयुक्तांनी धमकावले, बिल्डर कोर्टात

‘मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पूर्वी माझ्याकडूनच विकत घेतलेले दोन फ्लॅट पुन्हा मलाच चढ्या किंमतीने विकत घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. इतकेच नव्हे तर माझ्याकडून त्या दोन फ्लॅट्ससंदर्भात एक कोटी २१ लाख रुपये घेतल्यानंतर त्याविषयीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासही टाळाटाळ केली. आपल्या पदाचा दुरुपयोग करून मला फसवण्याबरोबरच बर्वे यांनी मला धमकावले’, असे गंभीर आरोप करत अंधेरीतील एका बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मोहम्मद अर्शद मोहम्मद कलीम सिद्दिकी यांनी यांसदर्भात अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत याचिका केली आहे. याविषयी मंगळवारी न्या. रणजित मोरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. तेव्हा सिद्दिकी यांच्या तक्रारीविषयी काही कायदेशीर पावले उचलण्यात आली का, अशी विचारणा खंडपीठाने सरकारी वकिलांना केली आणि यासंदर्भात ४ सप्टेंबरला म्हणणे मांडण्यास सांगितले.

‘बर्वे यांनी जोगेश्वरी मजासवाडी येथे सुरू असलेल्या माझ्या एका इमारत प्रकल्पातील दोन फ्लॅट विकत घेण्यासाठी २०१४मध्ये एका मित्राच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना व त्यांच्या पत्नी शर्मिला यांना २०१५मध्ये बाजारभावापेक्षा कमी किंमतीत म्हणजेच सुमारे एक कोटी ३५ लाख रुपयांना दोन फ्लॅट विकले. मात्र, तरीही त्यांनी व्हॅट व जीएसटी भरण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने मीच ती रक्कम भरली. त्यानंतर पैशांची गरज असल्याचे सांगून बर्वे यांनी डिसेंबर २०१८मध्ये हे दोन्ही फ्लॅट विकण्याचा आग्रह माझ्याकडे धरला. सध्या गृहनिर्माण बाजारात मंदी असल्याने योग्य किंमतीसाठी ग्राहक मिळणे कठीण असल्याचे मी त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी मलाच विकत घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मी त्याच किंमतीत विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, मी त्यांना एक कोटी २१ लाख रुपये दिलेही. मात्र, त्यांनी व त्यांच्या पत्नीने करारनाम्यावर स्वाक्षरीच करण्याचे टाळले. शिवाय नंतर अचानक एकूण दोन कोटी ७५ लाख रुपयांची मागणी केली.त्यानंतर बर्वे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माझ्या मागे लावले. त्या पोलिसांनी माझ्या कार्यालयात येऊन गोंधळही घातला. अशाप्रकारे मला धमकावून आणि खोट्या प्रकरणात गोवण्याचा धाक दाखवून आयुक्त माझा छळ करत आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला द्यावेत आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी’, अशी विनंती सिद्दिकी यांनी याचिकेत केली आहे. या साऱ्या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोपही सिद्दिकी यांनी याचिकेत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *