पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडमधील अनेक घरात, दुकानात शिरले आहे. तसेच पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे. भामरागडमध्ये जिकडे तिकडे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलीस व महसूल विभाग पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अहेरी तालुक्यात मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आलापल्ली येथील विद्यार्थिनी शेवंता गणपत सातपुते ही राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय महागाव येथे सकाळी ७ वाजता जात असताना आलापल्ली-सुभाषनगर मार्गावरील नाल्यावर तोल गेल्याने पडून मृत्यू झाला.
शेवंता ही बाराव्या वर्गात शिकत होती. ती गावाहून महागावला शाळेत जाण्यासाठी निघाली असता नाल्यात तिची सायकल पडली. सायकल वाहत जाणार म्हणून ती सायकल पकडण्यासाठी गेली असता मागून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. यात तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह वाहत जाऊन मुक्तापूरजवळील नाल्याच्या पुलाला अडकला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली.
