म्हशींचे भांडण सोडवताना शेतकऱ्याने गमावला जीव

दोन म्हशींचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील निरगजानी गावात घडली. संतोष कुमार असे ६५ वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून तो निरगजानी गावचा रहिवाशी आहे. म्हशींच्या हल्ल्यात जखमी संतोष यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बुधावारी सकाळी संतोष कुमार हे रोजच्या सारखे आपल्या म्हशीच्या गाडीतून शेतावर जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात समोरून येणाऱ्या म्हशींनी संतोष कुमार यांच्या गाडीच्या म्हशींवर हल्ला केला. हे पाहताच गाडीतून उतरत संतोष कुमार यांनी हल्लेखोर म्हशींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत एका हल्लेखोर म्हशीचे शिंग संतोषकुमार यांच्या छातीतच घुसले. त्यांना अनेक ठिकाणी जखमाही झाल्या.
संतोष कुमार खाली कोसळलेले पाहताच स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संतोषकुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात धाव घेत संतोषकुमार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
संतोषकुमार यांचा अपघाती मृत्यू असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *