ठाणे, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिकमधील शाळांना आज सुट्टी

गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि उद्याही जोरदार पावसाची हवामान खात्याने वर्तवलेली शक्यता या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि शिर्डीमधील शाळांना आज सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 ठाण्यात आज सोमवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यातही अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही सुट्टी जाहीर केली आहे. नाशिकमध्येही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिवाय घराघरांत पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे नाशिकमध्येही सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी,शिर्डी आणि रायगडमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने येथील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

विद्यापीठांनाही सुट्टी 

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यालय, अहमदनगर व नाशिक उपकेंद्रे, विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांमधील सर्व संलग्न महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *