विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलिस ठाण्यातील कामकाज

पालघर जिल्हा स्थापनेला १ ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने वसई तालुक्यातील सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी वसई-विरारमधील एकूण ५०० विद्यार्थ्यांनी विविध पोलिस ठाण्यांना भेट दिली.

विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी पालघर पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांसाठी पोलिस ठाण्यांत माहिती सत्राचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यांतील विविध विभाग, वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा, पोलिस कोठडी, पासपोर्ट व्हेरिफिकेशन या सर्वांची माहिती दिली. तसेच, पोलिस ठाण्यातील विविध शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत मोकळा संवाद साधत त्यांना पोलिसांचे कामकाज सांगण्यात आले आणि त्यांच्या शंकांचे निरसन या वेळी केले. वसईतील न्यू इंग्लिश स्कूल, माणिकपूर येथील आयजीजे, तसेच वालीव येथील दयानंद स्कूल, होली क्रॉस स्कूल, नालासोपारा येथील सोपारा स्कूल, अण्णासाहेब वर्तक स्कूल, डॉ. डी. जे. गाळवणकर, सेंट जॉन्स स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सातही पोलिस ठाण्यांत त्या त्या भागातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. वसई पोलिस ठाण्यात वसई १००, माणिकपूर येथे ४५, वाळिव येथे ६७, तुळींज येथे ३०, नालासोपारा येथे ५०, विरार येथे १०० आणि अर्नाळा येथे ५५ अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यांतील कामकाज पाहिले. पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांच्या संकल्पनेतून आणि वसई अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गुरुवारी पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *