गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावली: आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याची घोषणा करणारे नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नाईक यांनी पक्षाची वाट लावली. कल्याण, मीरा-भाईंदर व भिवंडीत पक्ष संपवला,’ असा आरोप आव्हाड यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला.

सचिन अहिर, मधुकर पिचड यांच्या पाठोपाठ गणेश नाईक हे नवी मुंबई महापालिकेतील ५७ नगरसेवकांसह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी आज राजीनामाही दिला. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली. ‘राष्ट्रवादी पक्षाने व शरद पवार यांनी नाईकांवर कसा व किती विश्वास टाकला, हे त्यांनी सोदाहरण सांगितले. नाईकांच्या घरातील सर्वांना राष्ट्रवादीनं पदं दिली. पण नाईकांनी पक्षासाठी काहीही केले नाही. त्यांना २०१४ सालीच पक्ष सोडायचा होता. मी माझ्या नेत्यांच्या ते लक्षातही आणून दिलं होतं. मात्र, त्याचा नाईकांवर जास्त विश्वास होता. अखेर आज नाईकांचा लबाड चेहरा समोर आला, असं आव्हाड म्हणाले.

‘गणेश नाईक भाजपमध्ये येत असल्याचं समजल्यापासून मंदा म्हात्रे त्यांना शिव्या घालत आहेत. तरीही ते लाचारासारखे तिकडे जाताहेत आणि हे स्वाभिमानाच्या गोष्टी करतात. आम्हाला त्यांच्या जाण्यानं काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी पुन्हा मोठ्या ताकदीनं उभी राहील,’ असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *