कल्याणमध्ये मेंदूज्वराने दोन लहानग्यांचा मृत्यू

पावसाळ्यात सर्दी-तापाचे रुग्ण वाढत असून कल्याणमध्ये दोन दिवसांत दोन लहानग्यांचा मेंदूज्वरामुळे मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली असून हा मेंदूज्वर नेमका कसला आहे याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडले जाणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.

दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे कृष्णा मल्ला यांनी श्लोक या आपल्या ७ वर्षीय मुलाला २२ जुलै रोजी कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याला व्हायरल ताप असल्याचे सांगत औषध दिले. मात्र त्याचा ताप उतरत नसल्यामुळे २३ जुलै रोजी डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. त्यानंतर त्याला उलट्या आणि फिट्स सुरू झाल्या. नंतर हळूहळू त्याचा प्रतिसाद कमी होत गेला आणि बुधवारी संध्याकाळी तो कोमात गेला. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित करत व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बुधवारी संध्याकाळी याच रुग्णालयात चार वर्षांच्या तनुजा सावंत हिला दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच ती कोमात गेली होती. ब्रेनडेड झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी नमूद केले आहे.

गेल्या महिन्यात बिहारमधील मुजफ्फराबाद येथे मेंदूज्वराने (चमकी ताप) शेकडो मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कल्याणमध्ये दोन लहानग्यांचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे परिसरात संसर्गजन्य तापाचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *