म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गिरणी कामगारांच्या घरांबाबतही अजब सल्ला दिला आहे. या कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे म्हणाले.
लोकांचा म्हाडावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे म्हाडाने मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे बांधावी. मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावे’, असेही विखे यांनी सुचवले. ‘म्हाडाकडे असलेल्या मुंबईतील ५६ वसाहतींमधून अधिकाधिक घरे उभे करणे सुरूच राहील. मात्र आता त्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच आता परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाने मुंबईबाहेर जावे. तसेच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्रधान्य द्यावे. गिरणी कामगारांना नवी मुंबई, उरण, बेलापूर भागातील नैना गृहप्रकल्पात घरे द्यावीत’, अशा सूचना विखे पाटील यांनी केल्या. या बैठकीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी दीपेंद्रसिंह खुशवाह, दिनकर जगदाळे, शिवशाही पुनर्वसन कंपनीच्या संचालक डॉ. निधी पांड्ये आदी अधिकारी उपस्थित होते.
