सध्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष विश्चचषक स्पर्धेकडे लागलं आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेला दणक्यात सुरुवात केली असून अपेक्षेप्रमाणे वाटचाल सुरु केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र भारतासाहित जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे आवर्जून लक्ष असतं. पण या सर्व चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने ब्रिटनमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने तर ब्रिटनमध्ये जवळपास महिनाभर पडतो इतका पाऊस एका दिवसात पडेल असा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या पावसामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील एक सामना रद्द झाला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत हा सामना पार पडणार होता. पावासमुळे विश्वचषक स्पर्धेतील इतर सामन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सामना १६ जून रोजी पार पडणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट असून तो रद्द होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, भारताचे आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत २ सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताला विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानचे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने झाले असून त्यांनी १ सामना गमावला, १ सामना जिंकला आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला.
