वादळात घर कोसळून चिमुकल्यांचा मृत्यू

जोरदार वादळी पावसामुळे घर पडून सुट्टीसाठी आजोळी आलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना ओतूरजवळील तेलदरा वस्ती येथे सोमवारी सायंकाळी घडली.

वैष्णवी विलास भुतांबरे (वय ६) आणि कार्तिक गोरख केदार (वय २) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चिमुरड्यांची आजी चिमाबाई केदार (वय ६५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिमुरड्यांचे आजोबा बापू लक्ष्मण केदार हे वेळीच घराबाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला. सायंकाळी वादळामुळे ओतूर बसस्थानकातील मोठ्या होर्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळला. मात्र, यात कोणीही जखमी झाले नाही.

ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत सापडलेल्या दोन्ही चिमुकल्यांना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केेल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली दोन्ही नातवंडे सुट्टीनिमित्त आजोळी आली होती. त्यांचा डोळ्यादेखत दुर्देवी मृत्यू झाल्याने आजोबांसह मुलांच्या आई-वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *