जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिच्या खूनप्रकरणी पठाणकोट कोर्टाने पामुख्य आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह पाचजण दोषी ठरवले आहेत. विशेष न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला.
कठुआ प्रकरणामुळे देशभरात वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा खून करण्यात आला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
