पावसाचा तडाखा, कुठे पाणी तर कुठे वीज खंडित

मिरज, बारामती, पुणे, नगर, औरंगाबाद आणि साताऱ्यामध्ये शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. रणरणत्या उन्हामुळे शरिराची होणारी काहिली शमविण्यासाठी अनेक दिवसांपासून सर्वचजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात आहेत. अखेर शनिवारी पहाटे आणि रविवारची उकाड्याने नकोशी झालेली दुपार अचानक आलेल्या टपोऱ्या थेंबांनी अल्हाददायक झाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसलेल्या वळवाच्या पावसामुळे घरांवरची छप्परे उडाली तर झाडे उन्मळून पडली तर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मिरज पूर्व, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात शनिवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली होती. रविवारी सकाळी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

शनिवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दिवसभर आणि रविवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. मात्र, रविवारी दुपारनंतर हवेत गारवा निर्माण झाला. तालुक्यातील भोसे, कळंबी, सोनी, तानंग, सावळी परिसरात पावसाने हजेरी लावली. अधूनमधून वीजांचा कडकडाट सुरू होता. आरग-मंगसुळी या सीमाभागातील गावांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे एक मोठे झाड उन्मळून पडले.

रस्त्यांवर भरले पाणी 

वाढलेल्या तापमानामुळे सकाळपासूनच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रविवारी संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर दाटून आलेले ढग, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह झालेल्या पावसामुळे सायंकाळनंतर शहरातील वातावरणच बदलले. काही भागांमध्ये पहिल्या पावसानंतरच पाणी भरल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. सायंकाळी साडेसहानंतर रात्री साडेआठपर्यंतच्या अवघ्या दोन तासांत ३० मिलिमीटर पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून संध्याकाळी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

बारामती तुंबली

शहरासह तालुक्यात मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह वादळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरिपट उडावली. शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. मागील दोन दिवसांपासून शहरात कमालीचा उकाड जाणवत होता, दरम्यान नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामे केली नसल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिले.

वीजप्रवाह खंडित

सातारा शहर आणि परिसरात शनिवार-रविवार सलग दोन दमदार पाऊस झाला. पूर्ण उन्हाळाभर वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सारा आसमंत काळ्या ढगांनी व्यापून गेला होता. दुपारी साडेतीन नंतर टपोऱ्या थेंबांनी जमीन चिंब झाली. वेगाने वाहणार वारे आणि अधून-मधून होणाऱ्या विजेच्या कडकडाटामुळे परिसरातील वीजप्रवाह बंद झाला.

धान्य भिजल्याने नुकसान

 जामखेड शहरासह तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक छावण्यांवरील छत उडून गेले. अरोळेवस्ती येथे घरावरील पत्रे उडाले. यात वृद्ध महिला जखमी झाली असून घरातील संसारोपयोगी वस्तू व धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. मागील चार पाच दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण होत होते. पाऊस येईल या आशेने सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दोन दिवसांपासून उकाडाही वाढला होता. रविवारी सायंकाळी जोरदार विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *