तलावांमध्ये १० टक्केच पाणीसाठा

उन्हाच्या वाढत्या तडाख्यासोबतच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने तलावांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जून अखेरपर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस लांबणीवर गेल्यास राखीव साठा वापरावा लागणार आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दहा टक्के पाणीकपातीमुळे दैनंदिन पुरवठा ३५०० दशलक्ष लिटरपर्यंत आला आहे. सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र, मागील वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे यावर्षी तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे. सात तलावांमध्ये मिळून १ जून रोजी १ लाख ४३ हजार ८५९ दशलक्ष लिटर तर, भातसा व वैतरणा धरणात १ लाख ७० हजार दशलक्ष लिटर राखीव साठा आहे. दोन्ही मिळून ३ लाख १३ हजार ८५९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. या दोन्ही पाणीसाठ्यांच्या आधारे जुलैअखेरपर्यंतच पुरवठा करणे पालिकेला शक्य आहे. पालिकेकडे सध्या उपलब्ध असणाऱ्या ३ लाख १३ हजार ८५९ दशलक्ष लिटर साठ्यामुळे मुंबईत आणखी पाणीकपात करणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *