गेल्या काही वर्षांपासून कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षीही भीषण दुष्काळ आहे. जिल्ह्यातील जनावरांच्या चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जैनमुनी विनम्रसागर महाराज यांची अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे ९७५ जनावरांची एकमेव चारा छावणी सुरु आहे. दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या चारा छावणीला प्रशासनाने कसलीही मदत न केल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्यातही यावर्षी भीषण पाणीटंचाईचे चटके आहे. नागरिकांना घागरभर पाणी मिळविण्यासाठी राना-वनात फिरावे लागत आहे. त्यात जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करताना शेतकरी मेताकुटीला येत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन जैनमुनी विनम्रसागर महाराज यांच्या दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २६ मार्च २०१९ पासून अहमपूर तालुक्यातील धसवाडी येथे चारा छावणी सुरु करण्यात आली. या चारा छावणीत अहमदपूर तालुक्यातील तब्बल ९७५ जनावरे आहेत.
परिसरात चारा आणि पाणी नसल्यामुळे तीन जिल्ह्यातून चारा मिळवून कडबा कुट्टी करून तो जनावरांना दिला जातो. या छावणीमुळे आपली जनावरे वाचल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
