मुंबईच्या डबेवाल्यांना ५०% शाळांमध्ये प्रवेशबंदी

दक्षिण मुंबईसह शहरातील बहुतांश शाळांनी मुंबईच्या डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलल्याचं बहुतांश शाळांकडून सांगितलं जात आहे.

काही पालकांनाच आपल्यापाल्यांसाठी डबे नकोत. पण ते यावर जाहीरपणे बोलत नाहीत. पाल्यांच्या आहारात बदल होईल. वर्ज्य असलेले पदार्थ पाल्यांना खावे लागतील, अशी भीती त्यांना आहे, असं समजतं. ‘शहरातील अंदाजे ५० टक्के शाळा, त्यातही बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्ही एकेकाळी शहरातील शाळांमध्ये जवळपास १ लाख डबे पुरवायचो. पण हाच आकडा आता २० हजारांवर आला आहे,’ असं नुतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्सचे रघुनाथ मेडगे यांनी सांगितले.

‘एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. कँटिन चालवणाऱ्या ठेकेदारांना नफा मिळवून देण्यासाठीच विद्यार्थ्यांना डबे पुरवण्यास मनाई केली आहे,’ असा आरोप मुंबई डबेवाले संघटनेचे नेते सुभाष तळेकर आणि मेडगे यांनी केला आहे. मात्र, अनेक शाळा व्यवस्थापनांनी या आरोपांचे खंडन केले आहे. जेवणाचे डबे आणताना वाटेत काय होईल, हे सांगता येऊ शकत नाही. तर शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं आहे. अनेक पालक या निर्णयाच्या बाजूने आहेत. कँटिनमधील जेवण घेणे बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांना घरचं जेवण आणण्यास परवानगी दिली आहे, असं जी. डी. सोमानी स्कूलचे प्राचार्य ब्रायन सेयमूर यांनी सांगितलं. ‘सकाळी पाच तासच शाळा भरते. दुपारी जेवणाच्या वेळी विद्यार्थी घरी जातात,’ असं गिरगावच्या सेंट तेरेसा स्कूलच्या फादर अँथोनी फर्नांडिस यांनी सांगितलं. याशिवाय मुंबईतील अनेक शाळांनी सुरक्षेचं कारण दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *