हजचा विमानप्रवास १३ हजारांनी महाग

हजसाठी औरंगाबादहून जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रवास तब्बल १३ हजारांनी महाग झाल्याने भाविकांची कोंडी झाली आहे. सध्या ८८१ यात्रेकरूंनी औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाण्याचा पर्याय निवडला आहे.
मुस्लिम धर्मियांसाठी हजची यात्रा पवित्र समजली जाते. राज्यभरातून औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई येथील केंद्रावरून भाविकांना हज यात्रेला जाता येते. दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. मात्र, यंदा औरंगाबादहून हजला जाणाऱ्यांचा विमानप्रवास महागला आहे. यंदा हज यात्रेसाठी मराठवाड्यातून अडीच हजारांवर भाविक जाणार आहेत. यातील ८८१ यात्रेकरूंनी औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाण्याचा पर्याय निवडला आहे. मराठवाड्यातून जाणाऱ्या अनेक हाजींनी औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास करून विमानाद्वारे मुंबई ते जेद्दाह असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रती प्रवासी एकूण दोन लाख ७७ हजार ९५० रुपयांचा खर्च येणार आहे. नागपूरहून जाण्यासाठी प्रती प्रवासी दोन लाख ७९ हजार ६०० रुपयांचा, तर औरंगाबादहून थेट जेद्दाहला जाणाऱ्यांना प्रती प्रवासी दोन लाख ९१ हजार १०० रुपये खर्च येत आहे. या खर्चात कुर्बानी कुपनची किंमत जोडलेली नाही. मुंबईहून हज यात्रेसाठी जाणारे किमान तीन महिन्यानंतर रवाना होणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी विमान प्रवासाचे दरही ठरविण्यात आले आहेत. एका यात्रेकरूला मुंबईहून जेद्दादला गेल्यास त्यासाठी विमान दर, विमानतळाचे चार्जेस असे एकूण ६७ हजार ८४३ रुपये खर्च होणार आहे. तर औरंगाबादहून जाणाऱ्यांना हा खर्च ८० हजार ९८७ रुपये इतका राहणार असल्याची माहिती हज कमिटीच्या वतीने देण्यात आली.

हज यात्रेचे नियोजन करताना, हज कमिटी ऑफ इंडिया तसेच परराष्ट्र विभागाकडून ‘रियाल’ चलनाच्या माध्यमातून सर्व खर्चाचे नियोजन करण्यात येते. यात राहण्याचा खर्च आणि इतर सुविधा देण्यात येत असतात. मात्र, हज यात्रेसाठी विमान सेवा एअर इंडियाच्या माध्यमातूनच निवडण्यात येते. विमान प्रवासासाठी रियाल किंवा रुपये या चलनाचा वापर न करता, डॉलर या चलनाचे वापर करण्यात येत असतो. यामुळे विमान तिकीट अधिक महागात पडत असल्याचा दावा हज कमिटीशी संबंधित असलेल्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *