अभिनेते सयाजी शिंदे शाळांमध्ये करणार ‘नर्सरी’

हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. या प्रेमापोटी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा-शाळांतून छोटेखानी नर्सरी (रोपवाटिका) करण्याचे ठरवले आहे. शाळेत तयार केलेल्या रोपांचे संबंधित मुलांकडूनच रोपण करवून घेऊन व त्याचे संगोपन करण्याचेही काम त्यांना देऊन त्यांच्यात वृक्षप्रेम रुजवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

मराठी नाटके व चित्रपट, तसेच हिंदी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू चित्रपटांतून बहुतांश खलनायकी ढंगाच्या व काही विनोदीही भूमिका केल्याने चित्रपट रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सयाजी शिंदे यांनी मागील तीन-चार वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे. राज्यात १९ ठिकाणी त्यांनी सुमारे साडेतीन लाखांवर झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचे काम केले आहे. सयाजी पार्क उपक्रमांतून देशी झाडांच्या देवराया त्यांनी उभ्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने ही चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी ‘ट्री स्टोरी’ फाउंडेशन स्थापन केले असून, त्या माध्यमातून वृक्षप्रेमींना संघटित करून त्यांच्याद्वारे वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचे काम हाती घेतले आहे. नगरला पत्रकार परिषदेत त्यांनी या मोहिमेची माहिती दिली.

शाळांतून रोपवाटिका

शालेय विद्यार्थ्यांनी आंबे, जांभूळ, चिंच व अन्य देशी व उपयुक्त झाडांच्या बिया संकलित करून शाळेत त्याची छोटेखानी रोपवाटिका तयार करायची व नंतर या बियांतून उगवलेली रोपे घराजवळ वा परिसरात रोपण करण्याची आणि नंतर पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याची ही मोहीम आहे. त्या झाडाला त्या संबंधित मुलाचेच नाव देण्यात येणार असल्याने आपल्या नावाचे झाड लहानाचे मोठे करण्यात मुले नक्कीच पुढाकार घेतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. निसर्ग रक्षणासाठी शाळांचे व्यवस्थापन व शिक्षकांनी मुलांमधील अशा वृक्षप्रेमाला शक्य ती मदत व प्रोत्साहन देण्याचेही आवाहन त्यांनी केले. शाळांतून शिकणाऱ्या प्रत्येक मुलाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर पर्यावरण संतुलन राखण्यात मोठे योगदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नगरमधील अशी पहिली शालेय रोपवाटिका येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (७ मे) शिंदे यांच्या हस्तेच सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झाडांचे करतो वाढदिवस

अभिनेता असल्याने व वृक्षांची आवड असल्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास आपल्याला बोलावले जाते. जोरदार फोटोसेशन केले जाते. पण नंतर लावलेली झाडे जळून गेली, तरी कोणी पाहात नाही. त्यामुळे आता वृक्षारोपणासाठी कोणी बोलावले, तर आधी झाडे लावून वर्षभर जगवली की नाही, याची खात्री केल्यानंतरच अशा कार्यक्रमांना जातो, असे त्यांनी सांगितले. वृक्षवाढीसाठी काटेसवर, बेल, चिंच, जांभूळ वा अन्य देशी उपयुक्त झाडांचे वाढदिवस साजरे करून त्यांच्या रोपांच्या मिरवणुका आम्ही अनेक गावांतून काढल्या असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *