भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रसार

सोशल मीडिया आणि मीडियाचा प्रभावी वापर करत जनसंपर्क आणि ‘इमेज बिल्डिंग’चं काम अगदी नेटकपेणानं हाताळणारं मोदी सरकार आता आपल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक आगळीवेगळी शक्कल लढवणार आहे. ट्रेनमध्ये गाणी गात भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची मदत घेऊन आपल्या योजनांबाबत जनजागृती करण्याचा सरकारचा विचार आहे. वाचून थोडं विचित्र वाटेल, पण त्या दृष्टीनं तयारी सुरूही झाली आहे.

वासुदेव, गोंधळी, शाहीर, कीर्तनकार या लोककलावंतांच्या माध्यमातून समाजजागृतीचं, प्रबोधनाचं काम आपल्याकडे पूर्वापार सुरू आहे. जनमानसांत जाऊन अत्यंत साध्या-सोप्या, पण तितक्याच रंजक शैलीत हे लोककलाकार सामाजिक संदेश देत असतात. जेव्हा प्रसारमाध्यमं नव्हती, तेव्हा या जनजागृतीनं मोठी सामाजिक क्रांती घडवली आहे. याच परंपरेतून प्रेरणा घेत, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहीम, यासारख्या सरकारी योजनांची थेट जनमानसांत जाऊन माहिती देण्याची कल्पना सरकारच्या मीडिया युनिटमधील काही मंडळींना सुचली. त्यानंतर, अधिकाधिक लोकांपर्यंत रोज पोहोचणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना त्यांना ट्रेनमध्ये गाणी गाणारे भिकारी दिसले आणि प्रसार मोहिमेसाठी त्यांची मदत घेण्याचं निश्चित झालं.

मुंबईतील लोकलमध्ये अनेक भिकाऱ्यांची कुटुंब गाणी गात भीक मागून पोट भरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यापैकी काहीजण चांगले गायकही आहेत. त्यांच्या या कलेचा योग्य वापर आम्ही करून घेणार आहोत. त्या माध्यमातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटू शकेल, असं माहिती आणि प्रसारण खात्याच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. गायन आणि नाट्य विभागाकडे या प्रकल्पाची जबाबदारी असून या मोहिमेची आखणी आकाशवाणी करणार आहे. सुमारे ३ हजार भिकाऱ्यांना गाण्याचं योग्य प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. पुढच्या महिन्यात मुंबईत प्रायोगिक तत्वावर हे अभियान सुरू होणार असल्याचं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

हे अभियान सुरू झाल्यानंतर या गायकांना भीक मागावी लागू नये, यादृष्टीनं त्यांना आर्थिक सहकार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी इन्सेन्टिव्ह मॉडेल तयार करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. या मोहिमेत लहान मुलांना सहभागी केलं जाणार नसल्याचंही त्यानं आवर्जून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *