दिवसाला ९ हजार रुपये हवेतच!

लोकलमधील जास्तीत जास्त विनातिकिट प्रवाशांवर कारवाईचा प्रयत्न करून दंडाच्या रकमेद्वारे रेल्वेच्या महसुलात भर टाकणारे तिकीट तपासनीस (टीसी) रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ‘अवाढव्य’ लक्ष्याने मात्र हैराण झाले आहेत. नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून दिवसाला ४ ते ५ हजार रुपये जमणे अशक्य असताना थेट ९ हजार रुपयांचे लक्ष्य टीसींना देण्यात आले असून, ते गाठणे अशक्य असल्याचा दावा टीसींकडून करण्यात येत आहे.

एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ कालावधीत ३२ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १५८ कोटी, ९३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी २९ लाख, १२ हजार विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून १४३ कोटी, २१ लाखांची वसुली करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा विनातिकिट प्रवाशांमध्ये ९.८९ टक्के आणि दंडाच्या वसुलींमध्ये १०.९८ टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

पुनर्विचार व्हावा: टीसींची मागणी

गर्दी असो वा अन्य वेळ, तिकीट तपासनीस विविध स्थानकांवर आपले कर्तव्य बजावत असतात. अनेकदी टीसींना पाहून विनातिकीट प्रवासी पळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यातून अपघात घडल्यास त्यास टीसी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी अनेक टीसींना विभागीय चौकशीचा सामना करावा लागतो. या प्रकरणांचा मानसिक त्रास टीसींसह त्यांच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागतो. अशातच आता देण्यात आलले दिवसाला ९ हजार रुपये दंडवसुलीचे लक्ष्य अयोग्य असून, त्याचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी तिकीट तपासनीसांकडून करण्यात येत आहे.

अभ्यास न करताच निर्णय?

तिकीट तपासनीसांना रोज सुमारे ९ हजार रुपयांच्या दंडवसुलीचे लक्ष्य देण्यात आले आहे. ते निश्चित करताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास अथवा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. यामुळे हे लक्ष्य अशक्य असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *