बंदी असतानाही बैलगाडी शर्यतींचा धुराळा

राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी असतानासुद्धा अंबरनाथ   तालुक्यातील उसाटणे गावाच्या वेशीवर बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडाला. याची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी या ठिकाणी धडक दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बैलगाडा शर्यतींसाठी बैलांवर मोठ्या प्रमाणावर शारीरिक अत्याचार केला जातो. यामुळे राज्यभरात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. याविरुद्ध बैलगाडा शर्यत आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर आवाजही उठवला होता. पुढे न्यायालयाच्या आदेशानंतर बंदी कायम करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी आजही बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात आहेत. यावर लाखो रुपयांची बक्षिसेही उडवली जातात. अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यांत मोठ्या प्रमाणात शर्यती होतात. होळीच्या दिवशी असाच प्रकार अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाच्या वेशीवर सुरू असल्याचे समोर आले. याची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी या ठिकाणी धडक दिली. मात्र पोलिस येण्याची चाहूल लागताच शर्यत खेळणाऱ्यांनी तेथून पळ काढला. या वेळी एक छकडा हस्तगत करण्यात आला. उसाटणे भागात या शर्यतीसाठी धावपट्टी तयार करण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी ही धावपट्टी दोन महिन्यांपूर्वी खोदली होती. मात्र पुन्हा याच ठिकाणी धावपट्टी तयार करण्यात आली होती. याप्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात पाच अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले गेले नसून तपास सुरू असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी विठ्ठल भोये यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *