मुंब्र्यातील मुलीची तीन वर्षांनंतर घरवापसी

मुंब्र्यातील एका ४० वर्षीय महिलेच्या अल्पवयीन मुलीचे नोव्हेंबर २०१६मध्ये अपहरण झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तिचा कोणताच पत्ता लागत नसताना ‘टिक-टॉक’ या सोशल मीडियावरील खात्यातून तिचा शोध लागला आहे. खोट्या खात्याच्या माध्यमातून ही मुलगी आपल्या नातलगांशी संपर्क साधून होती. तिची ओळख लक्षात येताच पोलिसांनी व्हिडीओ कॉल करण्यास या तरुणीला सांगितले. त्यानंतर तिला भेटण्याच्या बहाण्याने बोलवून तिला ताब्यात घेण्यात आले. ती मुलगी स्वखुशीने घर सोडून गेल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

मुंब्रा पोलिस ठाण्यात ५ नोव्हेंबर २०१६मध्ये एका महिलेने तिच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी ७ जानेवारी २०१७ रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून शोधाशोध सुरू होती, परंतु त्यानंतरही तिचा शोध लागत नसल्यामुळे ११ मे २०१८ रोजी हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासासाठी देण्यात आले होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू महाले या प्रकरणाचा तपास करत होते. दहा दिवसांपूर्वी टिकटॉक या मोबाइल अॅपवर अपहरण झालेल्या मुलीची बहीण व तिच्या पतीने भोजपुरी गाण्याचा एका व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ पाहून संबंधित मुलीने अभय शेट्टी नावाने या बहीण आणि तिच्या नवऱ्याशी संपर्क साधला. तर, फेसबुकवर मैत्री करून बोलणे सुरू करण्यात आले. या वेळी ही तरुणी कुटुंबातील सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याने तरुणीच्या मेव्हण्याने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीशी संपर्क साधत तिची आई आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी व्हिडीओ कॉल केल्यानंतर ही अपहरण झालेली मुलगी असल्याचे समोर आले. बहिणीला भेटण्यासाठी या मुलीला बोलावल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंब्र्यातून अपहरण झाल्यानंतर ती दहा दिवस गोरेगाव येथे राहत होती. त्यानंतर कॅटरिंगचे काम सुरू करून तीन ते चार महिने सुरत येथे राहिली. तेथून ती वसईला आली होती व सध्या नालासोपारा येथे राहत असल्याचे चौकशीतून समोर आले असून ती स्वत: घरातून पळून गेल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *