सरकारच्या पुतळ्याचे राळेणसिद्धीत दहन

ज्येष्ठ समाजसेवक यांचा उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. सरकारने त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. यामुळे राळेगणसिद्धी येथील संतप्त ग्रामस्थांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शनिवारी राळेगणसिद्धी येथे रास्ता रोको आंदोलन व पारनेरमध्ये बंद पाळण्यात येणार आहे.
लोकपाल आणि लोकायुक्त तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण  सुरू केले आहे. उपोषणामुळे त्यांचे वजन तीन किलोने कमी झाल्याचे तसेच प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगण्यात आले; मात्र, याही परिस्थिती हजारे यांनी बजेट पाहिले, त्यावर प्रतिक्रिया दिली, आंदोलनासंबंधीची आपली भूमिका भेटायला येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसमोर मांडली. हजारे यांचे जुने सहकारी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी राळेगणला येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत मानवी हक्क क्षेत्रातील वकील असिम सरोदे होते.

आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सकाळी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला. शनिवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर पारनेर शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हजारे यांची भेट घेऊन विचारपूस केली.

दिल्लीतील हालचालींकडे लक्ष

राज्य मंत्रिमंडळाने लोकायुक्तच्या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. बजेटमध्ये शेतकऱ्यांसंबंधी काही चांगल्या योजना आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लोकपालसंबंधी काही पावले उचलली तर चर्चेला संधी मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्र सरकारला लोकपालसंबंधी हालचाली कराव्या लागणार आहेतच. त्याच लवकर झाल्या तर मुख्यमंत्री राळेगणसिद्धीला येऊन हजारे यांची मनधरणी करू शकतात, असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *