नीरव मोदीच्या बंगल्याचे तोडकाम सुरू

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला नीरव मोदी  याच्या अलिबाग येथील बेकायदा बंगल्याचे तोडकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु, बंगला  खूप मोठा असल्याने आणि स्ट्रक्चरल इंजीनिअरच्या सल्ल्याने नियंत्रित स्फोटांच्या आधारे तोडण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रायगड  जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

अलिबाग तालुक्यातील वरसोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे इत्यादी गावे सीआरझेड क्षेत्रात असूनही अनेकांनी बेकायदा बंगले बांधले असल्याने ‘शंभूराजे युवाक्रांती’ संस्थेने अॅड. उदय निघोट यांच्यामार्फत जनहित याचिका केली. त्यात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या बंगल्यांमध्ये नीरव मोदीचाही बंगला असून त्यावरील कारवाई लांबल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. ‘नीरव मोदीचा बंगला खूप मोठा असल्याने स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या सल्ल्यानुसार तोडकाम सुरू आहे,’ असे अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सांगितले.

घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) पूर्वी या बंगल्याचा ताबा होता. मात्र, कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने अखेर इडीने त्याचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. ‘बंगल्याचा ताबा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. मात्र, त्यातील काही मौल्यवान वस्तू अन्यत्र हलवण्याचे काम अजूनही बाकी आहे, त्यासाठी आम्हाला थोडा अवधी हवा आहे’, असे ‘ईडी’तर्फे अॅड. नेहा भिडे यांनी सांगितले. तेव्हा, ‘वस्तू हलवण्याचे जे काही काम असेल ते जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून करून घ्या. त्यासाठी तुम्ही तोडकामाच्या कारवाईत हस्तक्षेप करू शकत नाही,’ असे स्पष्ट करून खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *