पाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणीचा मृत्यू

यंदा पावसाने अवकृपा केल्याने पाणीटंचाईची झळ असह्य होऊ लागली आहे. टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत असून, अनेक गावे व वाड्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत. सारदे (ता. बागलाण) येथे पाणीटंचाईमुळे शनिवारी जिल्ह्यातील पहिला बळी गेला. पाणी भरण्यास गेलेली तरुणी विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

बागलाण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सुमारे २२ गावे व दोन वाड्यांची टँकर तहान भागवत असून, १३ गावांचे टँकर प्रस्ताव तयार आहेत. सारदे गावात पाणीटंचाईमुळे नकुशी विठ्ठल आहिरे (वय २२) या तरुणीचा पाणी काढताना पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. सारदे गावात एक दिवसाआड, तर अधून-मधून दररोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. घरात पाणी नसल्यानेच नकुशीला विहिरीवर जावे लागले. किमान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांची तहान भागवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, जनावरांच्या चाराप्रश्नही तीव्र होऊ लागला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकरी उभ्या पिकांत जनावरे सोडत आहेत.

टँकर प्रस्तावात होतेय वाढ

जिल्ह्यात यंदा पावसाने पाणलोट क्षेत्रात हजेरी लावल्याने धरणे भरली, मात्र इतर पाणीस्रोत कोरडेच राहिले. आजमितीस जिल्ह्यात १११ टँकरद्वारे सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १०९ गावे व ३३० वाड्या तहानलेल्या आहेत. यामध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. अनेक गावांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत.

जिल्ह्यातील पाणीटंचाई

– टँकर संख्या : १११

– गावे : १०९, वाड्या : ३३० वाड्या

– लाभार्थी : २.३४ लाख लोकसंख्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *