मकर संक्रातीला पतंग उडवण्याचा शौक राज्यातही बहरला आहे. अहमदनगरमध्ये पतंग उडविण्याच्या नादात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर बंदी असलेला चायनीज व नायलॉन मांजा सर्रास वापरला गेल्याने त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या. एकट्या नागपुरात १०० वर लोकं जखमी झाले. अकोला येथे दोघे गंभीर जखमी झाले. तर नाशिकमध्ये एका युवकाचा कान कापला गेला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे पतंग उडविण्याच्या नादात एका युवकाचा वीज तारेला चिकटल्याने मृत्यू झाला. तर त्यास वाचविण्यास गेलेला त्याचा मामा जखमी झाला आहे. तुषार चंपालाल वाडिले (वय १८) असे मृताचे नाव आहे. मांजामुळे जखमी होण्याच्या सर्वाधिक घटना नागपुरमध्ये घटल्या. मेयोमध्ये दिवसभरात १०० पेक्षा अधिक लोकं उपचारासाठी आली होती. हात, पाय, बोट व गळा कापलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, पतंग पकडण्याच्या नादात दोन मुलांचे पाय फ्रॅक्चर झाले तर एका महिलेच्या पायावर टाके लागले.
अकोल्यात दोघे जखमी
अकोला जिल्ह्यातील शिवणी आणि निमवाडी येथे गळा व चेहरा कापल्याने दोन जण गंभीर जखमी झाले.
नॉयलॉन मांजावरील बंदी कागदावरच
राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे; मात्र बंदी असूनही चिनी व नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर झाल्याचे दुर्घटनांवरुन स्पष्ट होते.
दंतोपचारासाठी गेला; कान कापून आला!
येवला तालुक्यातील ममदापूर (जि. नाशिक) येथील युवक बापू बाबासाहेब गुडघे हा दातावर उपचार करण्यासाठी दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना, येवला येथील विंचूर चौफुलीवर मोटर सायकलमध्ये पतंगाचा मांजा अडकला आणि त्याचा कानच मागील बाजूने कापला गेला. त्याच्या कानाला पाच टाके घालण्यात आले आहेत.
