वसईच्या सुकेळीची अस्सल चव हरवली!

वसईच्या अवीट गोडीच्या केळ्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या सुकेळीची चव हरवू लागली आहे. सुकेळीसाठी लागणाऱ्या राजेळी केळ्यांचे उत्पादन घटल्याने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील केळी वापरून सुकेळी तयार केली जात आहे. त्यामुळे वसईच्या अस्सल सुकेळीची चव हरवली आहे.

पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख. या केळ्याला देशातच नव्हे तर परदेशातही चांगली मागणी असायची. पौष्टिक तसेच चवीला गोड सुकेळ्यांमुळे मागणी व बाजारभावही चांगला होता. शेतकऱ्यांचे व्यवसायाचे एक चांगले साधन होते. राजेळी जातीच्या केळ्यांपासून सुकेळी तयार केली जातात. वसई तालुक्यात आगाशी, नंदाखाल, नाळे, वाळुंजे आदी गावांमध्ये या राजेळी केळ्यांची झाडे प्रामुख्याने होती. आता राजेळी केळ्यांची लागवड दुर्मीळ झाली आहे. अलीकडच्या काळात शेतीच कमी झाल्याने तसेच केळीवरील रोगामुळे या केळ्यांची झाडे कमी झाली आहेत. त्यामुळे तमिळनाडू, केरळमधून राजेळी केळी आणून सुकेळी तयार केली जात आहे. मात्र वसईतील राजेळी केळ्यांचे खास वैशिष्टय़ होते. परंतु दक्षिणेकडील राजेळी केळ्यामुळे सुकेळीची चव हरवल्याचे वसईतील शेतकरी सांगतात.

हाताच्या बोटावर मोजता येणारेच शेतकरी सध्या सुकेळी बनवण्याच्या उद्योगात आहेत. वसईच्या हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील गावांमध्ये राजेळी केळ्यांची लागवड केली जायची. काळी माती आणि हवामान पोषक असल्याने केळ्यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात व्हायचे. त्यामुळे ठिकठिकाणाहून चविष्ट सुकेळ्यांची मागणी वाढली होती. मात्र आता जमीन व हवामान यात होणारा बदल, खर्च याचा न बसणारा ताळमेळ आणि होणारे नुकसान पाहता सुकेळींचे उत्पादन होत नसल्याची खंत सुकेळी तयार करणारे शेतकरी पायस रॉड्रिक्स यांनी व्यक्त केली.

सुकेळी अशी बनवतात..

सप्टेंबर ते जूनपर्यंतचे वातावरण सुकेळीसाठी योग्य समजले जाते. राजेळी जातीच्या केळीचा घड उतरवून सामान्य वातावरणात ठेवला जातो. त्याचा चीक पूर्णपणे निघून गेल्यानंतर मातीच्या रांजणात सुक्या गवतात ठेवून त्यावर दुसरे मातीचे रांजण ठेवले जाते. केळी पिकवण्यासाठी त्यात भाताचे तूस व शेण यांचा विस्तव करून ऊब दिली जाते. तीन-चार दिवसांत केळी पिकली की ती रांजणातून बाहेर काढली जातात. नंतर ती सोलून उन्हात सुकवली जातात. कारवीचा मांडव घालून त्यावर ही सोललेली केळी पसरवली जातात. आठवडाभर रोज ती उन्हात दिवसभर सुकवायला मांडवावर घातली जातात आणि संध्याकाळी उन्हे उतरू लागली की सूर्यास्ताआधी काढून पुन्हा टोपलीत रचून ठेवली जातात. सोनेरी रंगाची सुकलेली केळी केळ्याच्याच सुकलेल्या पानामध्ये म्हणजेच वावळीमध्ये बांधून विक्रीसाठी नेली जातात. साधारण वातावरणात दोन महिने ही सुकवलेली केळी राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *