अकोले: पत्नी,मुलीसह शेतकऱ्याची आत्महत्या

अकोले तालुक्यातील चास गावात एका तरुण शेतकऱ्याने पत्नी व दोन वर्षांच्या चिमुकलीसह गळफास लावून आत्महत्या केली. घरातच छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सायंकाळी तिन्ही मृतदेह आढळले. या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पांडुरंग राधू शेळके (३१ वर्षे), पत्नी सोनाली (२१ वर्षे) व मुलगी शिवन्या (वय २ वर्षे) यांच्यासह चास गावातील गाढवी शिवारात अनेक वर्षांपासून राहात होते. तेथे त्यांची एक हेक्टर शेती आहे. याशिवाय ते मजुरी करत होते. तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सोनालीशी त्यांचा विवाह झाला होता. सोमवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी किशोर कारभारी शेळके शेजारी राहणाऱ्या तरुण शेळकेकडे आला. त्यावेळी गायीचे दूध काढलेले नसल्याने तो पांडुरंगला पाहू लागला. मात्र, दरवाजा बंद असल्याने त्याने पांडुरंगच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह पाहून त्याने इतर मित्रांना फोन करून बोलावले. त्यानंतर पोलिस पाटील संदीप वाडेकर यांनी अकोले पोलिस स्टेशनला खबर दिली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सहकाऱ्यांसह बंद घराचा दरवाजा तोडून स्थानिक पंचांच्या मदतीने घरात प्रवेश केला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटना २४ तासांपूर्वी घडली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *