मंत्रालयासमोर उधळले तूर हरभरे

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्‍यामुळे, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी अचानक तूर, हरभरा उधळत आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ गोंधळ उडाला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शेतमाल फेकणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

उन्हातान्हात प्रचंड कष्ट करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित साफ कोलमडून पडले आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी छावा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तूर, हरभरा आणि मूग उधळत राज्य सरकारचा निषेध केला. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अचानक एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांमध्ये महिलांचाही सहभाग होता.

सरकारी कामे तालुका आणि जिल्हा पातळीवर होत नसल्यामुळे शेतकरी आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात गाठतात. यात बहुतेक शेतकरी असतात. या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात आहे. यामुळे आंदोलकांना ताबडतोब ताब्यात घेणे पोलिसांना शक्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *