वृक्षलागवडीतून पालिकेने कमावले ५० लाख!

राज्य सरकार एकीकडे वृक्षारोपणाची मोहीम राबवत असताना मुंबई महापालिकेने मात्र गेल्या १३ वर्षांमध्ये वृक्षलागवडीतून ५० लाख रुपये उत्पन्न कमावले आहे. विविध ठिकाणी लावलेल्या ताड, नारळ व आंब्याच्या झाडांपासून पालिकेला हे उत्पन्न मिळाले आहे.

पवई उद्यान, भांडुप टेकडी, विहार तलाव व वेरावली टेकडी येथे पालिकेने ताड, नारळ व आंब्याची झाडे लावली आहेत. या झाडांपासून दरवर्षी सरासरी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ऑगस्ट २००४ पासून ते जुलै २०१७ या १३ वर्षांत तब्बल ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून २०२१ पर्यंत आणखी ११ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

झाडांपासून भरघोस उत्पन्न मिळते हे लक्षात आल्यावर पालिकेने २००१ पासून त्याकडे विशेष लक्ष पुरविले आहे. २००१ मध्ये पवई, वेरावली, भांडुप येथील ताड, आंबा व नारळ या झाडांची बोली लावण्यात आली. त्यातून ९ लाख २० हजार रुपयांची कमाई झाली. त्यानंतर २००४ मध्ये तीन वर्षांसाठी झाडांची बोली लावण्यात आली. त्याहीवेळी पालिकेच्या तिजोरीत ९ लाख १७ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर या उत्पन्नात वाढच होत गेली. जुलै २०१७ पर्यंत पालिकेला या माध्यमातून ५० लाख रुपये उत्पन्न मिळाले.

सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत पालिकेच्या तिजोरीत १५ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. येथील झाडांची आता २०२१पर्यंत बोली लावण्यात आली असून या काळात पालिकेला ११ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. पवई उद्यानासह अन्य ठिकाणी पालिकेच्या मालकीची लाखो झाडे आहेत. यात २७० ताडाची झाडे, नारळाची ४१० झाडे, तर आंब्याची २०० झाडे आहेत. येथील गवताचीही विक्री करण्यात येते.

उत्पन्नाचा तपशील (रुपयांत)

२००४ : ५ लाख २३ हजार

२००७ : ९ लाख १७ हजार

२०११ : ९ लाख ३३ हजार

२०१४ : १० लाख

२०१७ : १५ लाख ३५ हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *