सणासुदीच्या काळात प्लास्टिकचा वाढता वापर

गणपती सजावटीसाठी प्लास्टिकचा आणि थर्माकोलचा भडीमार होत असल्याचे महापालिकेतर्फे मान्य करतानाच विशेष आयुक्त निधी चौधरी यांनी या काळात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर जोरदार कारवाईही सुरू असल्याचे सांगितले. तपास अधिकारी वारंवार बाजारपेठांमध्ये जाऊन प्लास्टिकवर कारवाई करत आहेत. थर्माकोल विक्रेत्यांवरही कारवाई होत असते, असेही त्या म्हणाल्या.

गुरुवारी, ६ सप्टेंबर रोजी एकूण १ लाख ४६ हजार १७५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये दुकाने व आस्थापना, बाजार आणि अनुज्ञापन खात्याकडून २ हजार ८९३ भेटींमधून दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. बुधवारी ५ सप्टेंबर रोजीही १ लाख ५ हजार ५५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर दंडाची रक्कम १ लाख ६० हजार रुपये होती. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांमध्ये गेल्या चार वर्षांतील कारवाईपेक्षा जास्त दंडवसुली करण्यात आली आहे. प्लास्टिकबंदी लागू झाल्यापासून केलेल्या कारवाईमध्ये १७ हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर ९७.७० लाख रुपये दंडाची वसुली झाली. २३ जून ते ३१ ऑगस्ट या दरम्यान केलेल्या धडक कारवाईचा हा परिणाम आहे. या आधी २०१५ मध्ये ८० लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

दहीहंडीपासून दिवाळीपर्यंत आता प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर दिसणार, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र आता प्लास्टिकचा पॅकिंगसाठी जो वापर होत आहे, त्यावर उत्पादकांनी माहिती छापलेली दिसून येते तसेच बंदी असलेल्या कॅरी बॅग मार्केटमध्ये दिसत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करता येईल. मात्र सणासुदीच्या काळात नागरिकांकडून पाच हजाराची दंडवसुली झाली तर त्यामध्ये वाद होतील. नागरिक एवढा दंड भरणार नाहीत. त्यामुळे ही दंडात्मक रक्कम कमी होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचसोबत नागरिकांनी जागरुकपणे प्लास्टिकचा वापर टाळावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *