मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी झालेल्या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाची मुलं नव्हती असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना तोडफोडीबद्दल विचारलं असता यामागे परप्रांतीय असल्याचं पोलीस तपासात समोर आलं असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात अशी टीका त्यांनी केली.
निवडणुकीदरम्यान केलेल्या विकास कामावर मतदान मिळते यावरून माझा विश्वासच उडाला आहे. कारण नाशिक शहरातील केलेल्या विकासकामाचा तेथील जनतेला विसर पडला होता, त्यामुळे त्यांनी मतदान करताना माझ्या पक्षाचा विचार केला नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासावर मतदान करणार नसाल तर सगळे भावनांसोबतच खेळणार असंही ते यावेळी म्हणाले.
औरंगाबाद शहराच्या अवस्थेला जनता स्वत: जवाबदार असून त्यांनी निवडून दिलेले राजकीय नेते केवळ जातीचे राजकारण करून भिती दाखवूनच मत मिळवतात, आणि तुम्ही त्याला बळी पडतात असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना-भाजपा-एमआयएम सगळ्यांचं आतमधून लाटसोटं असल्याची टीका करताना छोट्या मोठ्या दंगली घडवतात आणि तुम्हाला घाबरवतात असंही म्हटलं आहे.
नाशिकमध्ये अडीच वर्ष माझ्याशी राजकारण खेळलं गेलं – राज ठाकरे
मी जेव्हा नाशिक महानगपालिका पाहत होतो तेव्हा अडीच वर्ष पालिका आयुक्त दिले नव्हते. अडीच वर्ष आयुक्त न देताही जेवढ्या प्रकारची कामं नाशिकमध्ये घडली तेवढी दुसऱ्या कोणत्याही शहरात घडलेली तुम्हाला दिसणार नाहीत. जर नगरसेवकांना कामंच करायची नसतील तर आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शहरात काही नवीन करायचंच नसेल तर आयुक्त असले काय आणि नसले काय काय फरक पडतो. अडीच वर्ष महापालिकेला आयुक्त नसताना जर कामं होऊ शकतात तर मग दोन महिन्याचं काय घेऊन बसलात. अडीच वर्ष राजकारणच खेळलं गेलं ना माझ्याशी असं राज ठाकरे बोलले.