जन्मजात दोषामुळेच पेंग्विन पिल्लाचा मृत्यू

वीर जिजामाता भोसले उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनच्या दगावलेल्या पिल्लामध्ये जन्मजात दोष होता, असे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. साधारणतः या पेंग्विनमध्ये अंडी आणि पिल्लांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ६० टक्के असते. यासाठी अंडे पूर्णतः फलित नसणे, अंड्यात पिल्लाची स्थिती योग्य नसणे, अंड्यामधून पिल्लू बाहेर न येणे, पिल्लाला अन्न भरवायला पालक पेंग्विन असमर्थ असणे, अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे आदी कारणांचा समावेश होतो. हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांनी कृत्रिमरित्या अंडी उबवणे आणि पिल्लांना वाढवणे यासंबंधीच्या शास्त्रीय प्रबंधान्वये पहिल्या ३० दिवसांमध्ये पिल्लांचा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के असतो, असेही पेंग्विन पिल्लाच्या मृत्यूचे कारण देताना महापालिकेने सांगितले आहे.

पशुवैद्यक अधिकारी डॉ. शिवानी तांडेल यांनी पेंग्विनसाठी मुंबईमध्ये वातावरण योग्य नाही, या चर्चेला पूर्णविराम देत पेंग्विन कक्षाचे वातावरण पेंग्विनसाठी योग्य आहे आणि वातावरणामुळे पिल्लाचा मृत्यू झाला नाही, हे स्पष्ट केले. वातावरण चांगले नसते तर पेंग्विनमध्ये प्रजनन प्रक्रियेला सुरुवात झाली नसती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणात पेंग्विनच्या जोडीने एकच अंडे घातले होते. सर्वसाधारणपणे पेंग्विन दोन अंडी घालतात. त्यामुळे याचाही विचार झाला पाहिजे. पालक म्हणून या पेंग्विनचा पहिलाच अनुभव होता. कधी कधी पालक पहिल्या दिवसापासून पिल्लास भरवायला सुरुवात करतात तेव्हा पिवळा बलक वापरला जात नाही. या पिल्लाच्या बाबतीत असे होऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, डॉ. तांडेल म्हणाल्या.

मृत्यू कशामुळे?

– पिल्लाच्या मृत्यूचे कारण ‘पिल्लातील जन्मजात दोष’ असे शवविच्छेदनानंतर समोर आले आहे.

– अंड्यातील पिवळा बलक वापरला न जाऊन (yolk sac retention) तसाच राहिला गेला.

– त्यामुळे यकृतामध्ये बिघाड होऊन पिल्लाचा मृत्यू झाला असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *