टोमॅटोचे दर उतरले

पावसाने आता थोडी उसंत घेतली असली तरीदेखील आतापर्यंत व्यवस्थित पाऊस पडला असल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही समाधानकारक झाले आहे. परिणामी बाजारात योग्य प्रमाणात भाजीपाला येऊ लागला आहे. त्यातही टोमॅटोची चांगली आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात होत असल्याने टोमॅटोचे दर उतरले आहेत. उत्तम दर्जाचा टोमॅटो घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलोने तर त्या खालोखाल असलेला टोमॅटो सात ते नऊ रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही टोमॅटोचे दर २० रुपये किलोच्या घरात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात टोमॅटोची आवक वाढली असल्याने टोमॅटोचे दर उतरले आहेत. १६ ते १८ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो सध्या आठ ते नऊ रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही सध्या २० रुपये किलोने टोमॅटो मिळत आहेत. आणखी काही दिवस ही आवक अशीच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरूमधून टोमॅटोची आवक होत असते. सध्या या सर्व भागांतून ही आवक होत आहे. तसेच, महाराष्ट्रात सध्या टोमॅटोचे पीक अधिक चांगले आले आहे. मुंबई आणि उपनगरांना टोमॅटोची मागणी पूर्ण करण्यासाठी टोमॅटोच्या सरासरी साठ गाड्या बाजारात येणे गरजेचे असते आणि तेवढ्या गाड्या नियमित येत आहेत. त्यामुळे हे दर खाली आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *