शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणक्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. धरण परिसरात रविवारी दिवसभर ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा ८१.७६ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. दरम्यान, खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून मुठा नदीत चार हजार, तर कालव्यातून एक हजार ३५५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
टेमघर धरण परिसरात दिवसभर २३ मिलिमीटर, वरसगाव २४, पानशेत २३ आणि खडकवासला धरण परिसरात सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. पानशेत धरण ९७ टक्के भरले असून उर्वरित टेमघर आणि वरसगाव धरणे ७० टक्के एवढी भरली आहेत. चारही धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासलामधून मुठा नदीत टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरण शंभर टक्के भरल्यास पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
मागील वर्षी २२ जुलैपर्यंत धरणांमध्ये १९.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा होता. यंदा या तारखेपर्यंत २३.३० टीएमसी एवढा म्हणजेच ४.१५ टीएमसीने अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पुणेकरांची पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्य़ातील प्रमुख धरणांपैकी कळमोडी शंभर टक्के भरले असून भामा आसखेड ७५ टक्के, चासकमान आणि आंद्रा प्रत्येकी ९७ टक्के भरली आहेत.
जिल्ह्य़ासह पुणे विभागात अद्यापही टँकर
दमदार पावसामुळे शहरासह जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मात्र, बारामती आणि दौंड अशा दोन तालुक्यांमध्ये अद्यापही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. २९ वाडय़ा, तीन गावे आणि सात हजार १३८ बाधित नागरिकांना चार खासगी टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे, तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्य़ात माण, खटाव तालुक्यांमधील २४ हजार १८० बाधित नागरिकांना एक शासकीय आणि नऊ खासगी अशा दहा टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पवना धरणात ९० टक्के पाणीसाठा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण सुमारे ९० टक्के भरले आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे पवना धरणातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नाही. मात्र, पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याबाबत पूर्वसूचना दिली जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पाण्याचे संकट कोसळण्याची शंका शहरवासीयांमध्ये निर्माण झाली होती. जुलै महिना सुरू झाल्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केली. जून अखेरीपर्यंत पवना धरणामध्ये फक्त १९ टक्के पाणीसाठा होते. जुलै महिन्यापासून पवना धरणाच्या पाणीपातळीमध्ये ७० टक्के इतकी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाणही वाढले आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत २०२४ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे जोर गेल्या चार दिवसांपासून कमी झाला आहे. त्यामुळे सध्यातरी पवना धरणातून पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये केला जाणार नाही. पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग करायचा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
धरण पाणीसाठा टक्केवारी
(टीएमसी)
टेमघर २.५६ ६८.९५
वरसगाव ८.९४ ६९.७१
पानशेत १०.३७ ९७.३५
खडकवासला १.९७ १००
एकूण २३.८४ ८१.७६