रॉकेटद्वारे नाशिकमध्ये कृत्रिम पाऊस

रॉकेटद्वारे नाशिकमध्ये कृत्रिम पाऊस

आकाशात सिल्व्हर आयोडाईडचे रॉकेट सोडून कृत्रिम पावसाची भारतातील पहिली चाचणी नाशिकमध्ये केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर विदर्भ आणि मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिकमधील चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जूनमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचेही संकट गडद झाले आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठीच मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज या संस्थेला राज्य सरकारने कृत्रिम पावसाची चाचणी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसारच संस्थेचे कुलगुरु किरण नाईक आणि अमितराव यांनी गुरुवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी चर्चा केली.

 या चाचणीसाठी आवश्यक त्या परवानगी भारतीय हवामान विभाग आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) यांच्याकडून घ्याव्यात, असे काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दोन दिवसात भारतीय हवाई दल, पोलिस अधिक्षक आणि इतर विभागांशी समन्वय करुन आवश्यक ती परवानगी दिली जाईल, असे काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कृत्रिम पावसाची चाचणी होण्याची शक्यता आहे. या चाचणीवरच विदर्भ आणि मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *