आवक वाढल्याने बोंबील स्वस्त

खोल समुद्रातील मासेमारीबंदी लागू झाल्यापासून महागलेले बोंबील पुन्हा समान्यांच्या आवाक्यात आले आहेत. किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात बोंबील अधिक प्रमाणात येऊ लागले आहेत. आवक वाढल्यामुळे किमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. ८० ते १०० रुपयांना मिळणारा १० ते १२ बोंबलांचा वाटा आता ५० रुपयांत मिळू लागला आहे. त्यामुळे खवय्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. बोंबलांची आवक याही पेक्षा अधिक वाढण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

समुद्रातील प्रदूषण, त्यामुळे कमी झालेले मासळीचे प्रमाण आणि त्यातच लागू असलेली मासेमारी बंदी यामुळे एरव्ही परवडणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेही काही दिवसांपूर्वी महाग झाले होते. त्यांच्या किमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या होत्या. पाऊस सुरू झाला की उरणच्या किनाऱ्यावर वगळणीची चिवणी मासळी येते. त्यापाठोपाठ बोंबलांची आवक कधी वाढणार याची प्रतीक्षा मत्स्याहारी करतात. पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांत जाळ्यात येणारे बोंबील आकाराने लहान असतात. परंतु जुलै व ऑगस्टच्या सुमारास त्यांचा आकार मोठा होतो. त्यामुळे खवय्यांना या मोठय़ा माशांची प्रतीक्षा असते. मालवणी पदार्थाच्या हॉटेलमध्ये बोंबील फ्रायला जास्त मागणी असते. खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे पापलेट, सुरमईसारखे मोठे मासे बाजारात फारसे उपलब्ध नसतात. त्यामुळे या ग्राहकांना परवडणाऱ्या बोंबलांवरच समाधान मानावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *