मुंबईतील 1993 स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनची फाशी 14 दिवस टळली आहे. कारण याकूबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दया याचिका केली आहे. मात्र राज्यपालांनी ही याचिका फेटाळली, तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी 14 दिवसांचा अवधी दिला जातो.
गेल्या वर्षी चंदनतस्कर वीरप्पनच्या सहकाऱ्यांची फाशी जन्मठेपेत बदलली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती.
त्यानुसार फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला, त्याची दया याचिका फेटाळण्यात आल्याची सूचना द्यावी लागते. त्यानंतर 14 दिवसांनंतरच त्याला फाशी देऊ शकतात.
त्यामुळे याकूब मेमनची फाशी तूर्तास 14 दिवस टळल्याचंच समजतंय.
1993 च्या मुंबई स्फोटाप्रकरणी याकूब मेमनच्या फाशीवर मंगळवारी कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. याकूबच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली क्युरिटिव्ह पीटिशन सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. याआधीच राष्ट्रपतींनीही याकूबची दया याचिका फेटाळून लावली होती.
त्यामुळं येत्या 30 जुलै रोजी याकूबला नागपूर सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात येणार होतं. मात्र आता त्याची फाशी 14 दिवस टळली आहे.
मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट हे भारतातले पहिले महाभयंकर स्फोट होते. त्यात 257 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 700 जण गंभीर जखमी झाले होते. या महाभयंकर स्फोटात याकूब मेमनचा सहभाग होता.

