कांद्याची आवक घटली – मालवाहतूक संप

इंधन दरवाढ कमी करावी व मालवाहतूक भाड्यामध्ये वाढ करावी या मागणीसाठी मालवाहतूकदारांनी संप सुरू केला आहे. संपाचा फटका कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा आवकेवर होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसांपेक्षा मंगळवार व बुधवारी कांदा बटाट्याची आवक चांगलीच घटली आहे. स्थानिक मालवाहतूक सुरू असली, तरी बाहेरुन येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया कॉन्फ्युडरेशन ऑफ गुडस् व्हेईकल ओनर्स असोसिएशनतर्फे देशव्यापी संप सुरू केला आहे. संपामध्ये स्थानिक मालवाहतूकदार सहभागी झालेले नसले, तरी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात व उत्तरप्रदेश येथील मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत. बाजार समितीमध्ये नगर, पुणे व लासगाव येथून कांद्याची तर गुजरात व उत्तरप्रदेश येथून बाटाट्याची आवक होते. समितीमध्ये आलेला कांदा-बटाटा दक्षिणेकडील राज्यात पाठवला जातो. संपामध्ये येथील मालवाहतूकदार सहभागी झाले असल्याने येथून जाणारा मालच थांबला आहे.

मालाची उचल होत नसल्याने कांदा व बटाट्याची आवक मंदावली आहे. दररोज सुमारे ५० ते ६० ट्रक मालाची आवक होत असते. पण यामध्ये निम्म्याने घट झाली असून बुधवारी फक्त २५ ट्रक समितीमध्ये दाखल झाले. शुक्रवारी (ता. १५) कांद्याच्या ९,८८८५ तर बटाट्याच्या चार हजार पिशव्या आवक झाली होती. तर मंगळवारी कंद्याच्या ४,६९१ तर बटाट्याच्या १,३५५ पिशव्यांची आवक झाली होती. बुधवारी कांद्याच्या ७,७६९ व बटाट्याच्या ४,२३३ पिशव्या आवक झाली आहे. समितीमध्ये सोमवार, बुधवार व शनिवारी मालाची आवक जास्त होत असली, तरी यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. कांदा व बटाट्याची आवक घटली असली, तरी त्याचा दरावर मात्र अद्याप परिणाम झालेला नाही. कोल्हापूर येथून जाणारा कांदा दक्षिणेतील राज्यात जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तामिळनाडू व केरळ येथून होणारा नारळाचा पुरवठा कमी झाला आहे. कांदा-बटाट्याची आवक कमी असली, तरी संपाचा भाजीपाला वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र आठवड्याच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *