शिक्षा दिली म्हणून बलात्काऱ्यांनी पीडितेला जाळलं

झारखंडच्या चत्रा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी सामुहिक बलात्कार करून तिला जाळून टाकल्याचा प्रकार घडला आहे. संतापजनक बाब अशी की पंचायत समितीने आरोपींना शंभर उठाबशा आणि दंडाची शिक्षा दिली. याचा राग आल्याने पाचही नराधमांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात घुसून मारहाण केली आणि पीडितेला जीवंत जाळलं.

ही धक्कादायक घटना चत्रा जिल्ह्यातील तेंदुआ गावची आहे. पाच आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. पीडित मुलगी आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात आली होती. आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करत तिला जंगलात नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. घटना समोर आल्यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. हे प्रकरण पोलिसात न नेता पंचायत पातीळवर सोडवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आणि यातच घात झाला. पोलिसांनी आता घटनेची दखल घेऊन प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमलं आहे. गृह सचिवांनीही या प्रकरणाची नोंद घेऊन पोलीस उपायुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

पोलीस महानिरीक्षक आशिष बत्रा म्हणाले की, “बलात्काराचं प्रकरण पंचायत समितीने स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यासोबत आरोपींना शंभर उठाबशा काढण्याचीही शिक्षा पंचायतने दिली. यावरून आरोपींचं पंचायत आणि पीडितेच्या कुटुंबियांसोबत भांडण झालं. आरोपींनी पीडितेच्या कुटुंबियांवर हात उगारला आणि बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ते यावरच थांबले नाहीत, तर पीडितेच्या घरी जाऊन तिला जीवंत जाळलं गेलं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *