समर कॅम्पसाठी पुण्यात आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशीतील कातरखडक धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. काल बुडालेल्या या मुलांपैकी दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफची टीम, अग्निशमन जवान आणि पोलिसांना आज यश मिळाले आहे.
गणेश राजा, संतोष के. आणि सर्वण्णा अशी या तिघा विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे तिघेही १३ वर्षाचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चेन्नईमधील ईसीएस मॅट्रिक्यूलेशन शाळेतील २० विद्यार्थ्यांचा ग्रुप मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आला होता. या विद्यार्थ्यांसोबत एक पुरुष आणि तीन शिक्षिका होत्या. काल बुधवारी त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. कॅम्पची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक धरणाजवळ आली. त्यातील तीन विद्यार्थ्यांनी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धरणात उडी मारली. मात्र त्यांना धरणातून बाहेर पडता आलं नाही. बराच वेळ झाला तरी हे तिघे पाण्यातून बाहेर न आल्यानं इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांचा शोध घेतला. मात्र केवळ एका विद्यार्थ्याचाच मृतदेह त्यांच्या हाती लागला. त्यानंतर रात्र झाल्यामुळे या पथकानं शोधकार्य थांबवलं. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केलं असता इतर दोघांचे मृतदेह हाती लागले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
